राहुल गांधींचे विमान क्रॅश होणार होते, चौकशी अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

२६ एप्रिलला चार्टर्ड विमानाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे हुबळीला होते. यावेळी त्यांच्य विमानाला होणारा अपघात सुदैवाना टळला होता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पुढील २० सेकंदांमध्ये बिघाड दुरूस्त झाला नसता तर विमान अपघातग्रस्त झाले असते, अशी माहिती उघड झाली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे.

या घटनेची माहिती त्यावेळी राहुल गांधी यांनी दिली होती. त्यानंतर हा केवळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले गेले असले, तरी देखील काँग्रेसने मात्र हा कटाचा भाग असल्याचे म्हटले होते. यानंतर एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने द्विसदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली होती. याच चौकशी समितीचा अहवाल या वृत्तवाहिनीच्या हाती लागला असून चौकशी समितीच्या अहवात ही बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे एनडीए सरकारने समितीचा हा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. १२ जूनला वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने माहितीच्या अधिकारात अहवालाबाबत विचारणा केली होती. मात्र हा अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले होते. सरकारच्या या उत्तरानंतर ४९ दिवस उलटून गेल्यानंतरही हा अहवाल सार्वजनिक होऊ शकला नाही.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी तो दुरुस्त करण्यात वेळ लावला. मात्र, आणखी २० सेकंदांमध्ये तो बिघाड दुरुस्त केला गेला नसता, तर विमान अपघातग्रस्त झाले असते. या घटनेदरम्यान विमान ऑटो पायलट मोडवर होते. अशा स्थितीत पायलटने ते तत्काळ मॅन्युअल पद्धतीने हाताळणे गरजेचे असते.
राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २६ एप्रिलला नवी दिल्लीहून हुबळीला जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे आपल्याला धक्का बसल्याचेही राहुल यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यावेळी त्यांना कैलास मानसरोवराची आठवण आली होती. त्यांनंतर आपण कैलास मानसरोवराची यात्रा करणार असल्याचेही ते म्हणाले होते.