मुंबई, पुण्यासह कोकणात तीन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं संकट समोर उभे असताना आता हवामानातील बदलामुळे अवळाकी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे. उत्तर भारतात तुफान पाऊस आणि गारा पडत असताना आता राज्यात देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई, पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात रिमझिम पाऊस तर चार जिल्ह्यामध्ये गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरीची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचं संकट आलं आहे. जानेवारी महिन्यात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुढील तीन दिवस पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 6 ते 9 जानेवारी दरम्यान बीड, जालना, अकोला आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केवळ महाबळेश्वर थंड !

समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्याच्या सर्वच भागांमधील किमान तापमानात वाढ होऊन ऐन थंडीच्या हंगामात गारवा नाहीसा झाला आहे. मध्य महाराष्ट्रीतील किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल 7 ते 8 अंशांनी वाढले आहे. मराठवाडा, विदर्भात 4 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. कोकणातही किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत बुधवारी राज्यातील किमान तापमानाचा नीचांक थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये नोंदवला गेला. या ठिकाणी 15.7 अंश किमान तापमानाची नोंद झाली. मात्र हे तापमान ही सरासरीपेक्षा 2.6 अंशांनी अधिक आहे.

पाऊस केव्हा आणि कुठे ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्पाहूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.