डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने मनसेला धक्का दिल्यानंतर भाजपने देखील मनसेला धक्का दिला आहे. मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीत दोन नेत्यांनी अचानक मनसेची साथ सोडली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप करुन डॅमेज कंट्रोल केले आहे. मनसेकडून डोंबिवलीतील जुन्या शिलेदारांना नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे
महाराष्ट्र सैनिक श्री. मनोज घरत ह्यांची डोंबिवली शहराध्यक्षपदी निवड. #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/BuiiIn6pUE
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 2, 2021
मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी रात्री पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. तर आज (मंगळवार) सकाळी माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजकडे धाव घेतली. राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर यावर तातडीने तोडगा काढण्यात आला
डोंबिवली शहर अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड करण्यात आली. यापूर्वीही त्यांनी शहराध्यपद भूषवले होते. अचानक झालेल्या पडझडीची झळ कुष्णकुंजपर्यंत पोहचली. यामुळे अवघ्या 24 तासात जुन्या शिलेदाराला नवी जबाबदारी देऊन राज ठाकरे यांनी डोंबिवलीत डॅमेज कंट्रोल केले. ही निवड एक वर्षासाठी करण्यात आली आहे.
राजेश कदम यांच्यानंतर सर्वात मोठा धक्का हा मंदार हळबे यांच्या जाण्यामुळे पक्षाला बसला आहे. कारण मंदार हळबे हे मनसेचे गटनेते राहिले होते. याशिवाय मनेसकडून त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. पक्षाच्या सुरुवातीपासून ते सोबत होते. राजेश कदम हे देखील पक्षाचे जुने नेते होते. त्यांनी विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम केले. त्यामुळे राजे कदम यांनी पक्ष सोडल्याने कार्यकर्ते गोंधळात पडले होते. आगामी कल्याण डोंबिवली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात होत असलेली पडझड पाहता राज ठाकरे यांनी 24 तासात परिस्थिती नियंत्रणात आणली.