राज ठाकरेंना मी पढवलं…! ठीक आहे, बारामतीची परंपराच : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली. याच पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना ‘बारामतीचे पोपट’ असे संबोधले होते. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हटले की राज ठाकरेंना मी पढवलं. ठीक आहे. बारामतीची परंपराच आहे. मोरोपंत बारामतीचे होते’ अशा शब्दात पवारांनी उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पवारांच्या या उत्तरावरून ते मनसेसोबत आहेत. असे स्पष्ट होते.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “एखादा नेता जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या भाषणांमुळे जर अनेक जण प्रभावित होत असेल तर त्याच्यावर नक्कीच विचार व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरेंना मी पढवलं…ठीक आहे. बारामतीची परंपराच आहे. मोरोपंत बारामतीचेच होते”. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपट
राज ठाकरे यांनी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजप सरकारवर कडाडून टीका केली होती. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपटच असून, त्यांच्या भाषणांच्या स्क्रिप्ट या बारामतीहूनच येतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला होता. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय भाजपच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माढ्यातून शरद पवारांची माघार
मी माढा मतदार संघातून लढावं अशी पक्षातील लोकांचा आग्रह होता. परंतु एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माघार घेत आहे. त्यासोबतच नव्या पीढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षातून करण्यात आला आहे. असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

मी काही भितीने माघार घेत नाही. मी चौदा निवडणूका लढलो आहे. आतापर्यंत मी हरलो नाही. पंधराव्या निवडणूकीत मला घाबरण्याची काहीच गरज नाही. एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माढामधून माघार घेत आहेत. तर मी स्वत: निवडणूकीला उभं न राहता नव्या पिढीच्या उमेदवारांना काम करणाऱ्यांना संधी देण्याचे ठरले आहे. माझा नातू पार्थ पवारला मावळमधून उमेदवारी द्यावी असा आग्रह शेकापचे जयंत पाटील यांनी केला. पक्षातून तरुण पिढीला संधी द्यावी असा आग्रह आहे. त्यामुळे पार्थ पवारला उमेदवारी देण्याचे ठरले आहे. असे पवार म्हणाले.

त्यासोबतच पुण्यातील लोकसभेच्या जागांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. पुण्यात आमचे नगरसेवक कॉंग्रेसपेक्षा जास्त आहेत. परंतु पुण्यातील चार जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादी लढवते. त्यामुळे चारही जागा मागणे ही कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगली बाब नाही.

तर नगरमधून सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी उत्तर दिले की, नगरमध्ये दोन क्रमांकाची मतं राष्ट्रवादी कॉंग्रेसला आहेत. त्यामुळे नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच उमेदवार उभे राहतील. सुजय विखेंना उमेदवारी मिळू शकत नाही. तसेच सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाण्याने आघाडीवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. असे ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीसोबतच्या चर्चेला मी नव्हतो. माझ्या पक्षातील नेते उपस्थित होते. तर मी स्वाभीमानीच्या बैठकीला उपस्थित होतो. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. शेट्टींसाठी जागा सोडणार आहोत.