मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसे नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी मनसेच्या शिलेदारांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली होती. आता त्यापाठोपाठ मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनीही महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि मनसे युतीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी भाजपसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे.
येत्या काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे नेत्यांच्या बैठका घेत आहेत, पुढीलवर्षी मुंबई, पुणे मनपा निवडणुकांच्या दृष्टीनेही मनसे तयारीला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय मनसे नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मुलुंड येथे मनसे नेते अमित ठाकरे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, सध्या मुंबईतील विविध भागात मनसेच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. महाराष्ट्र सैनिकांशी संवाद सुरू असून मुंबई महापालिकेत 227 वार्ड पूर्ण ताकदीने लढले पाहिजे अशी भावना आणि इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु किती व कोणत्या जागा लढवायच्या याचा सर्वस्वी निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील असे ते म्हणाले.