मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यात शिवसेना अन् मनसेत श्रेयवादाची लढाई

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याकडे सरकारचा कल आहे. त्यासाठी लस उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीने कोव्हॅक्सिन बनवण्याची मान्यता दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यात सत्ताधारी शिवसेना अन् मनसेत मात्र श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांत हा निर्णय झाल्याने मनसेने याचे श्रेय घेतले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच केंद्राने हा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत.

 

 

 

 

 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचे पत्र गेल्यावर आली आहे. याला म्हणतात ठाकरे ब्रँड. कोरोना काळात राजकारण नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हते, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री ठाकरेंना चिमटा काढला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ट्विट करून 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिनसारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी. ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलात. याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले आहेत. केंद्रांकडून असेच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की असे राज यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी हाफकिन संस्थेला भेट दिली होती. त्यानंतर राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला म्हणून हाफकिनला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळाल्याचे शिवसैनिक सांगत आहेत.