औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचा फक्त झेंडा बदलला आहे भूमिका कधीच बदललेली नाही असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी औरंगाबादच्या नामांतरापासून ते मनसेच्या भूमिकांबाबत त्यांनी भाष्य केले.
औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलताना चांगले बदल हे नेहमीच व्हायला पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच हिंदुत्व हिंदुत्व म्हणून मिरवणाऱ्या पक्षांनी कधी हिंदुत्वासाठी मोर्चा काढला का ? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी नाव न घेता शिवसेनेला केला आहे.
कोरेगाव भीमाच्या तपासाबद्दल बोलताना एखाद्या गोष्टीची सुरुवात होते परंतु शेवट होत नसल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच आजच्या दिवशी एका वर्षांपूर्वी झालेला पुलवामा हल्ला हा दुर्दैवी असल्याचे देखील राज यावेळी म्हणाले.
शरद पवारांबाबत देखील केले भाष्य
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे हे करमणूक करतात असे विधान केले होते त्यामुळे तुमची पवारांशी असलेली मैत्री तुटली का असा सवाल यावेळी राज ठाकरेंना करण्यात आला. त्यावर बोलताना पवारांशी असलेले माझे वयक्तिक संबंध आजही चांगले असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.