गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याची गरज पडणार नाही : राज ठाकरे

अलिबाग : वृत्तसंस्था
”उद्योगांच्या नावाखाली कोकणची भूमी गिळंकृत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून अनेकदा कोकणवासीयांनी सांगूनही त्यांनी याबाबत विचार न केल्याने कोकणात मोठमोठे प्रकल्प येत आहेत. भविष्यात ही स्थिती भयंकर होऊन गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याची गरज पडणार नाही. कारण त्यासाठी आपल्याकडे जमीन शिल्लक राहणार नाही,” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

रायगड जिल्ह्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी सोमवारी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जीतेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष महेश कुन्नुमल, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ”या सरकारने मराठी माणसाच्या झोपडपट्ट्या तुडवत परप्रांतीयांच्या झोपड्यांना अभय दिले,”असा आरोपही त्यांनी केला.

”पाकिस्तानातून साखर आयातीची चर्चा आज का, यापूर्वी अनेक गोष्टींची आयात-निर्यात होत होती. पाकिस्तानातून येणाऱ्या कलाकारांना विरोध केल्यानंतर माझ्यावर आपल्याच देशातून टीका झाली,”याची खंत वाटते, असे ते म्हणाले.