3 दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, वर्गमित्रानंही केली आत्महत्या !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्यातील खेतडी नगर परिसरात बुधवारी 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत सापडला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावातील एक तरुणानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. श्लोलपुरा गावात ही घटना घडली आहे. दोघंही सरकारी शाळेत 12 वीच्या एकाच वर्गात शिकत होते. बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीविषयी तिच्या घरच्यांनी त्याला घरी बोलवून विचारणा केली होती.

झुंझनू डीएसपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात येत असतानाच गावातील एका तरुणानं दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोघंही एकाच वर्गात शिकत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते का या दिशेनंही चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या गावातील सुनीता देवी यांनी आदल्या दिवशीच त्यांच्या अल्वयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. अनोळखी तरुणाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र कोणताही पुरावा हाती लागला नव्हता.

बुधवारी सकाळी गावातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. मुलीचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीतून काढण्यात येत होता. याचवेळी गावातील 18 वर्षीय मनीष यानं दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मनीष ती मुलगी एकाच वर्गात शिकत होते. यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं मुलाचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.