संतापजनक ! 2 बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बेशुध्दावस्थेत टेकडीवर फेकलं

जालोर : पोलीसनामा ऑनलाईन – हाथरस (उत्तर प्रदेश) येथील सामुहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, राजस्थानमध्ये एक सामुहिक बलात्काराची लज्जास्पद घटना घडली आहे. जालोर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपुरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी पाचजण होते अशी माहिती समोर येत आहे.

चेतनराम भील असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाण्डालदेवल गावातून शनिवारी रात्री काही तरुणांनी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी या मुलींना बेशुद्धावस्थेत राजपुराच्या टेकडीवर फेकून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुली बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असूून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सांचौरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दशरथसिंह यांच्या आदेशानुसार जसवंतपुरा, रामसीन, बागोडा आणि भीनमाल पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन केली असून आरोपींचा शोध घेत आहेत. पीडितांच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका पीडितेने शुद्धीवर आल्यानंतर जबाब नोंदवला असून, सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले.

मुली बेशुध्द, जखमी अवस्थेत
घरातून अपहरण केल्यानंतर मुलींच्या शोधासाठी पोलीस राजपुरा येथे पोहोचले. राजपुराजवळील टेकडीवर या मुली बेशुद्धावस्थेत आणि जखमी अवस्थेत आढळून आल्या. एका मुलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. अल्पवयीन मुलींना आरोपींनी मारहाण केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.