धक्‍कादायक ! 50 लाखाच्या विम्यासाठी ‘त्यानं’ स्वतःचाच करून घेतला ‘मर्डर’, UP तून बोलावले ‘सुपारी किलर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भिलवाडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे तपास करणारे पोलीस देखील चक्रावले आहेत. याठिकाणी घडलेल्या खुनाच्या घटनेने पोलीस देखील चक्रावले असून खून झालेल्या व्यक्तीने स्वत: चीच सुपारी दिली होती. त्याच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळावी म्हणून त्याने स्वत: च आपली हत्या घडवून आणली. पोलिसांना सात दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीने स्वतःच्या हत्येचा कट रचला  होता. 50 लाख रुपये विम्याची रक्कम मिळण्यासाठी त्याने स्वतःची हत्या घडवून आणली. यासाठी त्याने दोन हत्यारांना 80 हजार रुपयांची सुपारी देखील दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले कि, बलवीरने हत्या घडवून आणण्यासाठी  उत्तर प्रदेशमधून  सुनील यादव नावाच्या व्यक्तीला बोलावून घेतले. त्यानंतर सुनील यादव याने राजवीर याच्या मदतीने बलवीर याची हत्या केली. मृत बलवीर याने अनेक जणांकडून सुमारे 20 लाख रुपये कर्ज घेतले होते. ते पैसे तो बाहेर व्याजाने देत असे. मागील काही दिवसांपासून त्याला मुद्दल परत मिळत होती मात्र व्याज मिळत नव्हते. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात चिंतेत होता. त्यामुळे त्याने आपला 50 लाख रुपयांचा विमा काढला. त्यासाठी कंपनीला 8 लाख 43 हजार रुपयांचा हफ्ता देखील भरला.

दरम्यान, त्याने या विम्याची रक्कम मिळण्यासाठी स्वतःच्या हत्येची सुपारी दिली. त्याने याआधी मारेकऱ्यांना खुनाची जागादेखील सांगितली. आपल्या मृत्यूनंतर हि रक्कम आपल्या कुटुंबियांना मिळावी अशी त्याची इच्छा होती. मात्र त्याच्या घरच्या लोकांना याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितल्याने हा मोठा पेच निर्माण झाला आहे.