5 वर्ष पक्षासाठी झटलो, पण गेहलोत मुख्यमंत्री झाले : सचिन पायलट

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली असून उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावर हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. पायलट यांनी नाराजीवर जाहीर भाष्य केले आहे. आपण पक्षासाठी इतके काम केलेले असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्यानेच आपण उपमुख्यमंत्रीपद घेतले असा खुलासा सचिन पायलट यांनी केला आहे.

मी अशोक गेहलोत यांच्यावर नाराज नाही. मी कोणतीही विशेष मागणी करत नाही आहे. काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही बेकायदा उत्खननाविरोधात आवाज उठवला होता ज्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारने वाटप रद्द केले होते. पण सत्तेत आल्यानंतर अशोक गेहलोत त्याच मार्गावर आहेत. गेहलोत मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करण्यासाठी जागा आणि मान काहीही देत नाहीत. प्रशासकीय अधिकार्‍यांना माझे आदेश न पाळण्यास सांगण्यात आले आहे. कोणतीही फाइल माझ्याकडे पाठवली जात नाही. गेल्या कित्येक महिन्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. जर मी लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करु शकत नसेल तर हे पद काय कामाचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मी हा मुद्दा अनेकदा पक्षासमोर उपस्थित केला. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना याबद्दल सांगितले होते. गेहलोत यांच्यासमोरही मांडले होते. पण मंत्र्यांच्या कोणत्या बैठकाच होत नसल्याने चर्चा किंवा वाद-विवाद होण्याची काही संधीच नव्हती, असेही सचिन पायलट यांनी सांगितले.