सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा निर्णय ! 31 डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची स्थापना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेते आणि तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा सस्पेन्स अखेर संपला आहे. रजनीकांत यांनी गुरुवारी (दि.3) ट्विट करून 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी 2021 महिन्यापासून कार्यरत होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रजनीकांत हे पूर्वीपासून तामिळनाडूतील जनतेला एक राजकीय पर्याय देण्याबाबत बोलत होते. त्यातच यंदा तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकाही पार पडत असूून, त्यांनी त्या दिशेने आपले पाऊल उचललेले दिसून येत आहे.

रजनीकांत यांनी यापूर्वी सोमवारी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसेच लवकरच आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचे म्हटले होते. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्याच वेळी ही भेट झाली होती. नुकतेच तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना त्यांच्या राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासूून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांच्या नावे असणारे एक पत्र तामिळनाडूत चर्चेचा विषय ठरले होते. यामध्ये डॉक्टरांनी काेरोना काळात प्रचार करण्यावरून रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी रजनीकांत यांना अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी हे पत्र आपले नसल्याचे स्पष्ट केले होते.

दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस तसेच स्थानिक पक्षांनी हा रणनीतीची भाग असल्याचा दावा केला होता. रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा आहे.