पबजी खेळणाऱ्या १० जणांना अटक

राजकोट : वृत्तसंस्था – पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर पबजी या गेमने अनेकांना वेड लावले आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राजकोटमध्ये पबजी खेळणे काही लोकांना महागात पडले आहे. गुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे. मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी आहे. यासंबंधीचे परीपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. पबजीवर परिक्षेच्या काळात म्हणजेच ९ मार्चपासून बंदी घालण्यात आली असून ३० एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत १० जणांना अटक केली आहे.

पबजीवर बंदी आणा, ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पबजी या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी मुंबईतील ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली आहे. त्याने एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिले आहे. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचे पत्र लिहिलं.

पबजीमुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुले हिंसक होत असल्याचे सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. ‘सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.