स्वाभिमानी नाराज, आघाडीच्या आधीच बिघाडी, येणार चौथी आघाडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यात युती होणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या मात्र आता या पक्षांची आघाडी होण्यापूर्वीच काडीमोड होण्याची शक्यता आहे. कारण छोट्या पक्षांना घेऊन स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा फिसकटण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी विरहीत नवी आघाडी उभी करण्याचे राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हातकणंगले, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, वर्धा, धुळे, नंदुरबार, माढासह अजून ५ ते ६ जिल्ह्यांत उमेदवार स्वाभिमानीच्या संपर्कात आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर विविध पक्षातील नेत्यांशी गाठीभेटी घेत असून ते दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत.छोट्या घटकांना एकत्र घेऊन चौथ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू खासादर राजू शेट्टींनी सुरु केली असल्याची माहिती आहे. इतर पक्षातील तिकीट कापलेल्या बंडखोर उमेदवारांना स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवारी देण्याची रणनीती आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज

उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती आणि दीड पट हमीभाव विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानी, भारिप, शेकापसारख्या पक्षांना काँग्रेस -राष्ट्रवादी गृहीत धरत असल्याची भावना आहे.
स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चेत बुलढाण्याच्या जागेवरून घोडं अडलं आहे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राष्ट्रवादीने बुलढण्यातून उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीला मोठा धक्का बसला आहे. या जागेवर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नावावर स्वाभिमानीकडून शिक्कामोर्तब केलेले आहे. तर वर्ध्यातली जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंसाठी सोडण्याची स्वाभिमानीची मागणी होती मात्र काँग्रेसकडून चारुलता टोकसची उमेदवारी जाहीर करून स्वाभिमानीचा पत्ता कट केला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज आहे.