…मग, नागपूरमधील RSS च्या मुख्यालयात कोरोनाचा कहर कसा ? : राजू शेट्टी

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – “जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली, असा दावा करत असेल. तर, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (‘आरआरएस’) मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोना विषाणूचा कहर कसा झाला?,” असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात धारावीतील कोरोना नियंत्रणावर भाष्य केले.

राज्य सरकारला धारावीमध्ये कोरोनाच्या फैलावावर रोखण्यात यश आले. मात्र, त्यानंतर आता श्रेयवादावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीमध्ये जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भाजपने केला आहे. त्याला चोख उत्तर देत राजू शेट्टी यांनी प्रतिपश्न त्यांना विचारला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “धारावीमध्ये ज्यावेळी परिस्थिती भयावह झाली होती. रुग्णाचा मृत्यू होत होता. त्यावेळी ‘आरएसएस’चे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर होते. जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशा प्रकारची कोणतीही बातमी पाहण्यात आली नाही. पण, जागतिक आरोग्य संघटनेने धारावी मॉडेलचे कौतुक केले तेव्हा मात्र, अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले.”

“माझ्या मनात एक शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (‘आरएसएस’) मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही करोनाचा कहर का झालाय. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही? हे मला माहिती नाही. कारण, मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलो नाही. इचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावे. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र करोनामुक्त करण्याचे काम करावे. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल,”अशा शेलक्या भाषेत शेट्टी यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील धारावीबाबत काय म्हणाले होते?
“ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचे कौतुक केले पाहिजे. पण, चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी करोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण, धारावीने करोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळविले. यांचं श्रेय राज्य सरकारचं नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (‘आरएसएस’)च्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारने केवळ भ्रष्टाचार केला आहे,” असा आरोप भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.