अनुदानाचा प्रश्न त्वरित मिटवा अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू, राजू शेट्टींचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दूध संघ आणि सरकार यांच्यातील वादात दूध उत्पादका बरोबरच शेतकरी देखील भरडला जात आहे. दूध संघांनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या दरातील अनुदानाची जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये रक्कम सरकारकडे थकीत आहे, यामुळे शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर वीसच रुपये दर मिळत असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे. यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू’ असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुधाला योग्य तो भाव मिळण्यासाठी संघटनेने जुलैमध्ये आंदोलन केले होते.आंदोलनानंतर गायीच्या ३.५ फॅट असणाऱ्या गुणवत्तेच्या दुधाला प्रतिलीटर २५ रुपये असा दर सरकारने सर्व संघांशी चर्चा करून निश्चित केला आहे .पाच रुपये प्रतिलीटर अनुदान देण्यास सरकारने १ ऑगस्टपासून  सुरुवात केली. दूध संघांने ऑनलाईन माहिती भरून देखील  प्रशासनाकडून चालढकल होत आहे. सर्वच संघाचे  १० सप्टेंबर नंतरचे अनुदान देणे बाकी आहे. हे अनुदान वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना कमी दर मिळण्यास सुरुवात झाली. अनुदानाचा हा प्रश्न सरकार व दुधसंघानी त्वरित मिटवावा, अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्याने दुध बॅग्स पॅकिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलतांना आधी वेफर्स, गुटखा यांचे पाऊच बंद करा, मगच दूध पिशव्यांकडे वळा, या नियमातून दूध पिशव्यांना वगळावे अशी मागणी देखील त्यांनी केली.त्याचबरोबर केंद्र सरकार दुष्काळबाबाद गंभीर नसल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.