पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वारणसीमध्ये प्रचार करण्याची इच्छा आज पुण्यात बोलून दाखवली. साखर आयुक्तांना भेटल्यानंतर राजू शेट्टी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर संवाद साधला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वाराणसीत प्रचार करायला आवडेल का असे त्यांना विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीत प्रचार करण्याची आपली इच्छा आहे. मात्र, युपीए प्रमुखांनी सांगितले तरच, असेही शेट्टी म्हणाले. तसेच येत्या १० मे पासून बिहार आणि उत्तरप्रदेशात प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगितले.
राजू शेट्टी यांनी यावेळी दुष्काळाच्या मुद्यावर सरकारने केलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली. मंत्री दुष्काळ ग्रस्त भागात जात असताना त्यांचा आधीच बंदोबस्त केला जातो. आंदोलन करणाऱ्या कार्य़कर्त्यांना अगोदर ताब्यात घेतले जाते. यानंतर मंत्र्यांचा पोलीस बंदोबस्तात दुष्काळी दौरा सुरू होतो. यावरून लोकांच्या मनात किती उद्रेक आहे हे लक्षात येते. सक्तीची बँक वसुली, विद्यार्थ्यांची फी मोफत करणे या केवळ घोषणा आहेत. सध्या चारा छावणीमध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या छळ छावण्या आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अचारसंहितेबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, कर्तव्य टाळण्यासाठी आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे.