‘उद्धवा अजब तुझे सरकार’, राजू शेट्टींनी केला सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळावी यासाठी राजू शेट्टी राज्य सरकार विरोधात राज्यभर आंदोलने करत आहेत. काल त्यांनी बारामतीत मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नसल्याने आणि कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपांवरून राजू शेट्टी आणि त्यांच्या जवळपास 40 कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावर संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उद्धवा अजब तुझे सरकार… असे ट्विट करत, दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता ? असा सवाल विचारला आहे.

राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता ? अस ट्विट त्यांनी केलं आहे.

राजू शेट्टी यांनी ट्विटसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहेत. उत्पादन खर्चापेक्षा 15 रुपये कमी दराने तो दूध विकत आहेत. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांना दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे पोलिसांना वाटले नाही. परंतु परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर हो आम्ही गुन्हा केला आहे. पोलिसांना जे काय करायचे ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं, असे व्हिडीओत म्हटले आहे.

राजू शेट्टींच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क देखील लावले नव्हते. मोर्चाला परवानगी नसूनही गर्दी जमवून भाषणबाजी केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.