काय सांगता ?… म्हणून अनेक वर्षापासून ‘या’ गावात बहिण भावाला राखी बांधत नाही

गोंडा : वृत्तसंस्था –   रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. मात्र, एक असं गाव आहे तिथे तब्बल 50 वर्षापासून बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधलेली नाही. भीखमपूर जगतपुरवा असं या गावाचे नाव असून ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. या गावात रक्षाबंधनाचा उल्लेखही केला जात नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील जगतपुरवा येते 20 घरे अशी आहे, ज्या घरांमधील जवळपास 200 मुले, तरुण आणि वृद्ध रक्षाबंधनाचे नाव काढले तरी घाबरून जातात. स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच दशकांपासुन याठिकाणच्या बहिणीने आपल्या भावाला राखी बांधलेली नाही. या गावातून आसपासच्या गावात गेलेले तरुण जेव्हा आपल्या गावचे नाव सांगतात ते ऐकूनच आजूबाजूच्या मुली या तरुणांना राखी बांधण्यासाठी पुढे येत नाहीत.

ग्राम पंचायतीच्या मुख्य सदस्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, 1955 मध्ये जेव्हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता तेव्हा पूर्वजांपैकी एक जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे हा सण साजरा केला जात नाही. अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा जेव्हा मुलींनी हट्ट केला तेव्हा सण साजरा करायचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. रक्षाबंधनाची सगळी तयारी झाली एका मुलीनं आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला आणि गावावर शोककळा पसरली.

दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यानं ग्रामस्थांच्या मनात भीती आहे. त्यामुळे गेल्या 8 वर्षात आणि त्या आधीही या गावात रक्षाबंधन साजरा केला नाही अशी माहिती उषा मिश्रा आणि सूर्यनारायण मिश्रा यांनी दिली. या गावात रक्षाबंधन या सणाचं नाव काढलं तरीही इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर काटा येतो आणि गावातील मुलं दुसऱ्या गावात गेली आणि रक्षाबंधना दिवशी आपल्या गावाचं नाव सांगितलं तरी त्यांना राखी बांधण्याचे टाळले जाते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.