मतांसाठी जवानांना शहीद केले, ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आरोपप्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना, मत मागण्यासाठी जवानांना शहीद केल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुलवामा हल्ला हा एक कट होता. पॅरामिलिटरी फोर्स सरकारवर नाराज आहे. मतांसाठी जवानांना शहीत करण्यात आले. जम्मू आणि श्रीनगरदरम्यान कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. जवानांना अगदी साध्या बसमधू पाठवण्यात आले. सत्ता आल्यानंतर याची चौकशी केली जाईल आणि मोठमोठी नावे यामध्ये समोर येतील, असा दावाही यादव यांनी केला आहे. समाजवादी पक्षाच्या ‘होली मिलन’ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी सपाचे असंख्य कार्यकर्ते येथे जमा झाले होते. यावेळी बोलताना रामगोपाल यादव यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा एक कट असल्याचा गंभीर आरोप केला.

यादव यांच्यापूर्वी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी देखील पुलवामा हल्ल्याबाबत अशाच प्रकारचे विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या संगनमताने हा हल्ला झाला असे हरिप्रसाद यांनी म्हटले होते.
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे श्रीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावरून सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेकीकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली होती. त्यावरून देखील विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते.