अयोध्येत श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ‘मुहूर्त’ ठरलाय, स्वामी गोविंद गिरी महाराजांनी सांगितलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्याचा संदर्भात पुढील महिन्यात 4 एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली असून बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंददेव गिरी यांनी सांगितले कि, येत्या 30 एप्रिल रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चित होणार आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनाबाबत मांडलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. सोबतच सर्वच राज्यांनी आपापल्या प्रदेशाची भवने अयोध्येत बांधावीत म्हणजेच ती भुमी हिंदुस्थानची सांस्कृतिक राजधानी होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असले असते तर त्यांनाही याचा आनंद झाला असता, असेही ते यावेळी म्हणाले.

आज परमपूज्य गोविंद गिरी यांच्या अहमदनगर येथे सहकार सभागृहात पार पडलेल्या सत्कार समारंभावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम जन्मभूमीचा मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली. त्याचे आपण स्वागतच करतो. तसेच त्यांची आयोध्येत महाराष्ट्रातील लोकांसाठी एक सदन बांधण्याची भूमिका अतिशय योग्य आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची चार एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत भूमिपूजनाचा विषय व पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे. 30 एप्रिल रोजी या मंदिराचे भूमिपूजन करण्याचा आमचा मानस असून या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, श्री राम मंदिर बांधकामासाठी साधारणत: तीन वर्ष लागणार आहे. ज्याचा आराखडा तयार करण्यात आलेला असून 90% तोच राहणार आहे. पाषाणाने बांधले जाणारे हे संपूर्ण मंदिर कसे भव्यदिव्य व्हावे, तसेच यामध्ये अन्य काही सुधारणा करायची असल्यास त्या संबंधितही निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे . यामध्ये रामाची मूर्ती हीसुद्धा जी पुरातन आहे ती याठिकाणी राहणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, मंदिर उभारणीसाठी ज्यांना निधी द्यायचा आहे, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जे खाते उघडले आहे त्या खात्यामध्ये तो निधी जमा करावा, असे आवाहनही यावेळी गोविंददेव गिरीजी यांनी केले आहे. दरम्यान, मंदिराच्या उभारणीसाठी बालाजी देवस्थान यांनी आधीच शंभर कोटी रुपये जाहीर केले आहे . तसेच एका संस्थेने दहा कोटी रुपये देणगी जाहीर केली आहे. शिवसेनेने काल एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे आपण त्याचे स्वागतच करतो, असे ते म्हणाले.