‘आपल्यातला माणूसच न्याय देऊ शकतो’, मंत्री शिंदे यांचा रोहित पवार यांना टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मी या मातीतील असल्यामुळे भविष्यातील दूरगामी विचार करून मतदारसंघातील विकास कामांवर भर दिला. आपल्यातला माणूस असल्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणीची जास्त जाणीव होते, असे विधान करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला मारला.

घुमरी, ता. कर्जत येथे सभामंडपाचे भूमिपूजन पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलताना ते म्हणाले, मी आपल्यातला माणूस असल्यामुळे आपल्या अडचणींची जाणीव ठेऊन दूरगामी परिणामकारक ठरतील अशा विविध विकास कामांवर भर दिला. माझी नाळ इथल्या मातीशी जन्मपासूनच घट्ट असल्याने स्वार्थी विचार कधी मनाला शिवलेच नाही आणि म्हणूनच गेल्या अनेक दशकांचा विकासाचा अनुशेष भरून काढू शकलो. मागणी असेल तिथे तर कामे केलीच आहेत परंतु त्या सोबतच मागणी न करता देखील लोकाभिमुख विकासकामे करून आपल्या मतदार संघात सर्वांगिण विकासाची कास धरली.

गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत कि पश्चिम महाराष्ट्रातील काही नद्यांनी रौद्ररूप धारण करून सांगली, कोल्हापूर या भागात महापूरची परिस्थिती निर्माण झाली होती आणि एकीकडे आपल्या भागात दुर्दैवाने अजूनही चारा छावण्यांची गरज भासत आहे. याच गोष्टीचा विचार करत शासनाने नुकतेच “जलशक्ती” विभागाची स्थापना करत अति पर्जन्यवृष्टीच्या भागातील पाणी हे कमी पर्जन्यवृष्टीच्या भागात वळवून दुष्काळी भागाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी मोठा निर्णय केला आहे व त्यासाठी केंद्राने अंदाजे साडेचार लाख कोटीची तरतूद केली आहे.

तुकाईसारखा मोठा प्रश्न सोडवण्यात मला यश आले ते फक्त आणि फक्त आपल्या आशीर्वादाने आणि माझ्यातल्या इच्छाशक्तीमुळे अन्यथा असे बरेच जण म्हणून गेले कि तुकाई होईल ते माझ्या हातूनच परंतु त्यांच्याकडून ते काही होऊ शकलं नाही. जनतेची प्रत्येक मागणी ही रास्तच असते. विशेषतः शेतकरी बांधव यांची मूलभूत मागणी असते ती फक्त शेतीच्या पाण्यासाठी परंतु त्यासाठी आपले प्रश्न मांडत असताना पूर्णपणे परिस्थितीचा आढावा घेऊनच प्रश्न मंत्रिमंडळात मांडण्याचे काम लोकप्रतिनिधीचे असते आणि ते आपण केलेले आहे. कुकडीचे आवर्तन असो किंवा सीनाचे आवर्तन असो हे आपण नियमानुसार योग्य त्या प्रमाणात आपण सोडत आलो आहोत. म्हणून विकासाच्या मार्गाने जात असताना आपण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या साथीने आपण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढे देखील विकास करत राहील.

यावेळी श्री.कैलास अनभुले, श्री.सचिन अनभुले, श्री.रामभाऊ नाना, श्री.हरी आबा, श्री.पोपटराव अनभुले, श्री.भाऊसो पांडुळे, श्री. दादासो अनभुले, श्री.काशिनाथ अनभुले, श्री.सतीश चितळे व समस्त घुमरी ग्रामस्थ उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –