केंद्रीय मंत्री रामविलास पासवान रुग्णालयात दाखल, पक्षाची सुत्रं मुलाकडं सोपवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना आज (शुक्रवार) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितलं जातय. आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची सुत्रं सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. पक्षा संबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसेच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान हे निर्णय घेतील.

तेच अंतिम निर्णय असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मागील काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी असल्याच्या बातम्या मीडियातून येत होत्या. मात्र आपली प्रकृती खालावल्याचं लक्षात आल्यानंतर रामविलास पासवान यांनी ही माहिती उघड केली आहे. परंतु त्यांनी आपल्या आजाराबाबत माहिती दिलेली नाही.

रामविलास पासवान यांनी म्हटले की, कोरोना संकट काळात खाद्य मंत्री म्हणून आपली सेवा देण्यासाठी योग्य वेळी खाद्य सामग्री जागेवर पोहचवण्यासाटी हरएक प्रयत्न केले. याच दरम्यान प्रकृती आणखीन खालावू लागली. परंतु कामात काही अडथळे येऊ नये यासाठी मी रुग्णालयात दाखल होण्याचे टाळत होतो. मात्र, माजी प्रकृती ढासळल्याचं चिरागच्या लक्षात येताच त्याच्या सांगण्यावरुन मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

रामविलास पासवान यांनी आपल्या पक्षाची सर्व जबाबदारी मुलगा चिराग यांच्याकडे सोपवली आहे. ते म्हणाले, मला आनंद आहे की यावेळी माझा मुलगा चिराग माझ्यासोबत आहे आणि माझी शक्य तेवढी सेवा करत आहे. माझी काळजी घेण्यासोबतच तो पक्षाप्रती असलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे. मला विश्वास आहे की आपल्या तरुण विचारांनी चिराग पक्ष आणि बिहारला नव्या उंचीवर घेऊन जाईल. चिरागच्या प्रत्येक निर्णयासोबत मी कणखरपणे उभा आहे. मला आशा आहे की लवकरच बरा होऊन आप्तेष्टांजवळ येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांच्या या ट्विटरचे अनेक अर्थ काढले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. जवळपास 143 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची पक्षाची तयारी झाली आहे. याच दरम्यान पक्षाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी ही चिराग पासवान यांच्यावर असणार आहे.