शिवसेनेने राष्ट्रवादीची साथ सोडावी हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली : रामदास आठवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवसेनेने काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावे, हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली असेल, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच एनडीएमध्ये जी फुट पडली आहे ती बरोबर नाही. शिवसेना ही एनडीएमध्ये असली पाहिजे असे ही आठवले यांनी म्हटले आहे, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महाराष्ट्रामध्ये 225 जागा मिळायला पाहिजे होत्या. पण आपापसात दोन्ही पक्षांच्या बंडखोरीमुळे चाळीस ते पन्नास जागांचा फटका बसला असल्याचे आजच्या एनडीएच्या बैठकीत सांगितले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवेसेनेचा मुख्यमंत्री पुढच्या वेळी होऊ शकेल. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद आणि चांगली खाती घेऊन सरकार बनवावे, असेही आठवले म्हणाले. भाजपला 120 ते 125 जागा मिळाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. शिवसेनेची ही भूमिका योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवणे हे शिवसेनेसाठी घात आहे. ही बाळासाहेबांना आदरांजली ठरणार नाही.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, मुख्यमंत्रीपद देण्याबाबात भाजपकडून आश्वासन देण्यात आलेले नाही. काँग्रेस अजूनही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद घ्यावे आणि सरकारमध्ये सहभागी व्हावे, म्हणजे राज्यातील सध्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देता यईल असे म्हणाले. एनडीएच्या आजच्या बैठकीमध्ये शिवसेनेविषयी चर्चा झाली नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार टिकणार नाही असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Visit : Policenama.com