आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले-‘रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करु नका, जबाबदारी सरकारची सुद्धा आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांना उपयुक्त असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला डिवचले आहे. रेमडेसिवीरचा गेम डेसिवीर करु नका, असा टोला आठवले यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले पुढे म्हणाले, रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असेही रामदास आठवले म्हणाले. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची देखील आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाकरे सरकारने दुतोंडी भूमिका घेऊ नये

कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या अधिक आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी उत्तम काम करत आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह इतर सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्यावर राजकारण करु नये आणि खोडसाळ आरोप केंद्रावर करणे बंद करावे, असे आवाहन आठवले यांनी केले.