‘या’ खासदार पत्नी अन् आमदार पतीला हवंय राज्यात युतीचं सरकार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे मुळातच जनता भरडली जात आहे. परंतू अपक्ष आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत भाजपच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली परंतू आता त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांनी देखील हाच कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. नवनीत राणा यांना देखील राज्यात युतीचे सरकार हवंय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

निवडणूकीचे निकाल लागल्यापासूनच रवी राणा भाजपशी जवळीक बनवून आहेत. परंतू आता भाजपच सत्तेपासून दूर जात असल्याचे चित्र असताना रवी राणा हे देखील भोवऱ्यात सापडत असल्याचे दिसत आहे. कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान करावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांनी शिवसेनेचे 20 ते 25 आमदार फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.

दरम्यान मुख्यमंत्रिपदावरुन भाजप शिवसेनेत बिनसलं असे दिसते आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असे सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू आहे. त्यामुळे महाशिवआघाडी, जे सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत, ते वेळखाऊपणा करत आहेत की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. त्यानंतर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

खासदार नवनीत राणा यांनी राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीला शिवसेनेला जबाबदार धरले. राज्यात शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यात युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्यास उशीर होत असल्याचे देखील त्या म्हणाल्या. लोकसभेवेळी राष्ट्रवादीच्या समर्थनत निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांच्या युती सरकारसंबंधित भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पहिल्यांदा रवी राणा भाजपला पाठिंबा देताना दिसले आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी ही भूमिका का घेतली असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com