‘बारामती’करांनी पळवलेलं पाणी २ दिवसांत आणणार : रणजितसिंह नाईक निंबाळकर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक गाजलेला मतदार संघ म्हणजे माढा लोकसभा मतदार संघ. माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीवर भारी पडले आणि विजय मिळवला आहे. त्यानंतर रणजितसिंह यांनी थेट बारामतीकरांना आव्हान दिलं आहे. बारामतीकरांनी पळवलेलं नीरा देवघरचे पाणी दोन दिवसात आणणार, असं त्यांनी म्हटलं आहे. रणजितसिंह यांच्या विजयानंतर तिसऱ्या दिवशी दुष्काळी सांगोल्यात उपाययोजनांबाबत प्रशासनाची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

सत्तेत असताना ठराव करून नीरा देवधरचे चाळीस टक्के पाणी बारामतीला नेले होते. मात्र या ठरावाची मुदत दोन वर्ष संपूनही ते पाणी बेकायदेशीर वापरले जात आहे. आता दोन दिवसांत हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे, असं आश्वासन रणजितसिंह यांनी यावेळी दिले. तसंच बारामतीकरांना तसं आव्हानही दिलं आहे.

विधानपरिदषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. रामराजे निंबाळकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझी आई आणि नातेवाइकाबद्दल अपशब्द वापरले तर मी का संयम बाळगायचा? ते बदनामी करतात तर मी फक्त जे सत्य आहे ते बोललो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, या बैठकीत टँकर वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. त्यावर जर अधिकारी टँकर घोटाळा करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुचना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिली आहे.