‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले’, दानवेंचे बेताल वक्तव्य

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले, त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

त्यांच्या या विधानावर टीका करताना राष्ट्रवादीने ट्विट केले आहे की, हेच का भाजपचे बेगडी देशप्रेम?? देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अतिरेकी ठरवले.

रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ”साले” संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ‘एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले’ असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती.