दानवे म्हणजे मोठा माणसाचा पदर धरुन पुढे आलेला गावगुंड, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची जोरदार टीका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागच्या काळात स्व.प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात ते असतात. यातूनच त्यांनी शेतकरी विरोधात विधान केले असून त्यांनी तातडीने शेतक-यांची माफी मागावी, अशी मागणी दानवे यांचे जावई तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनी केली आहे.

दानवे यांनी शेतकरी विरोधातील विधानावर माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजीनगर येथील जलकुंभावर आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी दुपारी आंदोलनस्थळी हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुवा म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.