जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडणूक लढणार आहेत. जालन्याचा तिढा अखेर सुटला आहे. इतकेच नाही तर, ईशान्य मुंबईची जागाही भाजपाच लढवणार आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन स्पष्ट केलं आहे . जालन्याच्या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून रावसाहेब दानवे आणि अर्जुर खोतकर यांच्यात वाद होता. आता रावसाहेब दानवेच जालन्याची जागा लढवणार असल्याने अर्जुन खोतकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर एकीकडे आता शिवसेनेचा विरोध असताना ईशान्य मुंबईत कोण उमेदवार द्यायचा ? असा प्रश्न भाजपासमोर आहे.
दरम्यान ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ईशान्य मुंबईची जागा नेमकं कोण लढवणार असा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर असल्याचे दिसत आहे.

असा सुटला जालन्याचा तिढा – जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी युतीमधील नेत्यांनी चांगलीच शक्कल लढवली आहे.  मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची नेमणूक केली. नव्या जबाबदरीमुळे अर्जुन खोतकर यांची गोची होण्याची शक्यता आहे. तर पक्ष श्रेष्ठींकडून सुंठीवाचून खोकला घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे मात्र नक्की.

अर्जुन खोतकरांची भूमिका काय ? – गेल्या अनेक दिवसांपासून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात जालन्याच्या जागेवरून वाद सुरु होता. अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालन्याच्या जागेवर दावाही केला होता.  यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांचा शब्द अंतिम राहिल असंही खोतकरांनी सांगितलं होतं. मात्र आता दानवेंना उमेदवारी मिळणार असल्याने अर्जुन खोतकर यांची वैयक्तिक भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

भाजपचा उमेदवार कोण ? – ईशान्य मुंबईतही भाजपा लढणार असल्याचं जरी स्पष्ट झालं असलं तरी या मतदारसंघातून उमेदवार कोण द्यायचा ? हा प्रश्न मात्र कायम आहे . कारण ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसत आहे . येथे किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध कायम आहे . भाजपचा ईशान्य मुंबईचा उमेदवार कोण हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.