यांचं काही मिटेनाच राव …! दानवे – खोतकर वादात नवा डाव

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघातून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दानवेंनी थेट मातोश्रीची वाट धरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दानवे आणि खोतकर यांच्यातील वादळ राजकीय वर्तुळात चांगलंच घुमतंय. त्यात आता दानवे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता दानवे – खोतकर वादात कोणता नवा डाव रंगणार याची चर्चा सुरू आहे.

जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी गेल्या विधानसभेला युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वावर जहरी टीका केली होती. यामुळे नाराज झालेल्या आमदार खोतकरांनी दानवेंना लोकसभेला पराभूत करण्याचा विडा उचलला होता. युती झाली तरीही अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे अर्जुन खोतकर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभे राहण्यावर ठाम आहेत. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

दानवे -खोतकर त्यांच्या दिलजमाईसाठी सहकारमंत्र्यांची मध्यस्थी

या दोघांमधील दिलजमाईसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे नुकतेच रावसाहेब दानवेंना घेऊन खोतकरांच्या दर्शना बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. ‘जालना लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. माझं नेमकं काय म्हणणं हे मी सुभाष देशमुखांना सांगितलं आहे, ‘अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर खोतकरांनी दिली होती.

दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघाच्या मैदानातून मी अजून बाहेर पडलो नसल्याचे खोतकर यांनी याआधी म्हटलं होतं. तसंच याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून त्यांना भेटणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. त्यामुळे खोतकर जर या मतदारसंघातून उभे राहिले तर दानवेंसाठी ती मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण खोतकरांचा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं बोललं जातं. त्यामुळे ते दानवेंना चांगलीच टक्कर देऊ शकतात. म्हणून त्यांना रोखण्यासाठी आता दानवेंकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा ‘असा’ही विक्रम 

निविदा मंजूर होण्यापूर्वीच उड्डाणपुलाचे तिसऱ्यांदा भूमीपूजन