आमच्या काळात मोबाईल नेहमी ‘व्हायब्रेट’ करायचा : रावसाहेब दानवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोक मोबाईल उघडून पाहतात आणि खिशात ठेवतात, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. ते आज पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

दानवे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. आम्हाला काहीही झालं नाही. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना ? अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरिबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं ? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार कोण चालवतंय काही कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेलं हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचं काय होईल काही सांगता येत नाही, असं दानवे म्हणाले. हे सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही असेही ते म्हणाले.