चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणा या ‘बोलाची कढी, …’: रविकांत तुपकर

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकारने समाजात केवळ धर्मांत, जातीत, पोटजातीत भांडणे लावणे एवढेच काम केले आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे. शासकिय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २८ जानेवारीला पुण्यात होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना तुपकर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हा गप्पा मारणारा माणूस आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या घोषणा या बोलाची कढी…‘ ठरल्या आहेत. मोदींच्या काळात चांगले दिवस येतील असे वाटले होते. परंतु ते हिटलर ठरले. सर्व क्षेत्रात अस्वस्थता आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

तसंच सरकार आले तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती तसेच दीडपट हमीभाव ही दोन विधेयक मांडणार असेल तरच आम्ही महाआघाडीत येणार, असं तुपकर यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यातील सहा जागांचा प्रस्ताव महाआघाडीकडे दिला आहे. यामध्ये हातकणंगले, माढा, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.