RBI च्या ‘या’ निर्णयामुळे सहकारी बँकेतील कर्जदारांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॅपिटल टू रिस्क असेट्स रेशो (CRAR) नऊ टक्क्यांहून अधिक असलेल्या सहकारी बँकांना त्यांचे भाग भांडवल परत करण्याचा अथवा कर्जात वळते करण्याचा पर्याय आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा फायदा सहकारी बँकांमधील कर्जदारांना होणार आहे.

राष्ट्रीयकृत बँकांचे समभाग शेअर बाजाराशी निगडीत असतात. तर सहकारी बँकांचे समभाग कर्जाशी संलग्न असतात. सहकारी बँकांमधील कर्ज प्रकारानुसार कर्जाच्या अडीच ते तीन टक्के रक्कम म्हणून ठेवावी लागते. आरबीआयने समभागांवर लाभांश देण्यास मनाई केली आहे. त्याशिवाय समभाग परतही देता येत नव्हते. त्यामुळे कर्जदारांसोबत वादाचे प्रसंग घडत होते. यावर पर्याय म्हणून नागरी सहकारी बँक संघटनांकडून भाग भांडवलाची रक्कम परत देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आरबीआयने 9 टक्क्यंहून अधिक सीआरएआर असलेल्या बँकांना जून 2020 पासून भाग भांडवल रक्कम परत देण्यास हरकत नसल्याचा आदेश आज (बुधवार) काढला आहे.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांनी सांगितले की, पुरेसे तारण असलेल्या कर्ज रक्कमेच्या अडीच टक्के रक्कम भाग भांडवल म्हणून घेतली जाते. विना तारण कर्जावर पाच टक्के रक्कम घेतली जाते. सहकारी बँकांचे समभाग कर्जाशी निगडीत असतात. त्यामुळे त्यांना लाभांश दिला जात नाही. तसेच रक्कम परत देता येत नव्हती. थकबाकीदार कर्जदारांकडून ही रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याची मागणी करत होते. जर रक्कमेवर व्याज मिळत नसेल तर ती रक्कम अडवून काय फायदा होणार अशी विचारणा करण्यात येत होती. आता आरबीआयच्या निर्णयामुळे कर्जदारांना रक्कम परत घेता येईल किंवा कर्ज खात्यात वळती करता येईल.