‘कोरोना’तून बर्‍या झालेल्यांना प्रदूषित तसेच विषारी हवेचा धोका जास्त, तज्ज्ञांनी दिला ‘या’ आजाराची लस घेण्याचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना अन्य आजारांचा सामना करावा लागतोय. त्याला लॉन्ग कोविड असे म्हटलं जाते. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, वातावरणातील गारवा वाढणे, हवा प्रदूषण यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा आजारांचा सामना करावा लागू शकतो. तद्वतच, कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळा आणि वाढत्या प्रदूषणात ही लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना फ्लू या आजाराची लस देण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

बरे झाल्यावर सुद्धा करावा लागतोय सामना
जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोरोना संसर्गित रुग्णांना बरे झाल्यावर देखील अन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. रोमच्या रुग्णालयात भरती असलेल्या एकूण १४३ रुग्णांपैकी ८७ टक्के रुग्णांना दोन महिन्यांपर्यंत खोकला, सर्दी, थकवा, डायरिया, सांधेदुखी, मांसपेशीतील वेदना, फुफुसे आणि किडनी डॅमेज होणे यातील एकतरी लक्षणे दिसून आली होती. अर्ध्यापेक्षा अधिक रुग्णांना लॉन्ग कोविड मध्ये थकवा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता.

फ्लू या आजाराच्या लसीने काय परिणाम होणार
वाढत्या प्रदूषणामुळे, हिवाळ्याच्या वातावरणामुळे, उत्सवातील वाढत्या गर्दीने आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असे दिल्ली एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. ते म्हणाले, लॉन्ग कोविडच्या समस्येपासून बचावासाठी फ्लू या आजाराची लस घ्यायला हवी. जेणेकरुन इन्फेक्शन पासून बचाव करता येईल. तसेच एन्‍वार्यनमेंटल रिसर्च जर्नलमध्ये ऑगस्टमध्ये छापण्यात आलेल्या एका माहितीनुसार, लहान मुलांच्या फुफ्फुसातील वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी एंनफ्लूएंजा व्हायरसची लस प्रभावी ठरू शकते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीने लॉन्ग कोविडची समस्या दूर होण्यासाठी मदत मिळू शकते.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावर वायूच्या गुणवत्तेनुसार हवेतील PM२.५ प्रमाण ४०μg/m३ पेक्षा जास्त असू नये. त्याचप्रमाणे देशातील जवळपास सगळ्याच राज्यातील पसरलेली ७६.८ टक्के लोकसंख्या PM२.५ कणांच्या हवेत श्वास घेते. देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा या राज्यातील हवा सर्वात जास्त प्रदूषित असल्याचे ICMR ने सांगितले