राज्यात पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती – गृहमंत्री अनिल देशमुख

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन –  महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पोलीस विभागात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात लवकरच 5 हजार पोलिसांची पदभरती करण्यात येणार आहे. त्यानंतर 7500 पोलिसांची पदभरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी (दि. 4) दिली.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख अमरावतीमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. देशमुख म्हणाले की, महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे न्यायालयात तातडीने निकाली निघावे यासाठी आताच्या कायद्यात बदल करून त्याचे रुपांतर शक्ती कायद्यात करण्यात येत आहे. या कायद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. यासाठी सर्वपक्षीय 21 आमदारांची समिती गठीत केली असून शक्ती कायद्याचे अंतिम प्रारुप तयार करणे सुरू आहे. अंतिम प्रारूप मंजूरीकरिता विधानसभा व विधानपरिषेदेच्या होऊ घातलेल्या अधिवेशनात ठेवण्यात येणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख म्हणाले.

अन् गृहमंत्र्यांनी घेतला फडणवीसांचा समाचार

देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करीत आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री असताना व गृहखाते त्यांच्याकडे असताना नागपूरची किती गुन्हेगारी वाढली होती ते आता विसरले. नागपूरचा कुख्यात गुंड मुन्ना यादव हा कुणाचा कार्यकर्ता होता, असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. तुमच्या काळात तो तीन ते चार महिने फरार होता. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेता असताना मुन्ना यादव यांचा तपास करायचा असेल तर फडणवीस यांचे मोबाईलचे कॉल तपासले पाहिजे, असा आरोप मुंडे यांनी केल्याची आठवणही गृहमंत्र्यांनी करून दिली व फडणवीस यांचा समाचार घेतला.