ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’ काळात सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, राज्य पोलिस दलात 11384 जागांसाठी होणार मेगाभरती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याबरोबर पोलीसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार जागांसाठी मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे दिली. मंगळवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता परंतू उपमुख्यमंत्री पवार यांनी 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे निर्देश दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय
राज्यात १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.