विकासकांनी टाळाटाळ केल्यास म्हाडाकडून इमारतींचा पुनर्विकास

पोलिसनामा ऑनलाईन टीम- उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे काम खासगी विकासकाकडून तीन वर्षांत सुरू न झाल्यास संबंधित इमारती म्हाडाकडून ताब्यात घेऊन विकसित केल्या जातील, अशी तरतूद असलेले विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. उपनगर जिल्ह्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींसाठीही अशी तरतूद करण्याची मागणी अनेक सदस्यांनी केल्यावर याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले.

शेकडो जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडला असून खासगी विकासकांनी वेळेत कामे सुरू न केल्याने रहिवाशांची परवड होत आहे. खासगी जमीनमालकांच्या आडमुठया धोरणामुळे रहिवासी अडचणीत आहेत. हे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने ते म्हाडामार्फत ताब्यात घेऊन कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत कायदेशीर तरतूद करणारे विधेयक विधानसभेत मांडले होते.

मुंबईतील मोडकळीस आलेल्या व उपकरप्राप्त इमारतींच्या प्रश्नांवर सुनील प्रभू, अमीन पटेल, आशीष शेलार, पराग अळवणी आदी सदस्यांनी काही मुद्दे मांडले. शहराप्रमाणेच उपनगरांमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठीही हा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. तेव्हा सरकार त्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे आव्हाड यांनी सांगितले.