पुनर्वसन करा अन्यथा आम्हाला कुंटूंबासह गाव सोडून तेलंगणात जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी नांदेडमधील भुकमारी गावातील ग्रामस्थ शासनाकडे करणार आहेत. कंधार तालुक्यातील भुकमारी येथे १९६९ मध्ये सुगाव तलावाची निर्मिती करण्यात आली. १९७७ मध्ये गावात तलावाचे पाणी आल्याने ६७ घरे बाधित झाली होती. शासनाने गावाच्या पुनर्वसनासाठी जमीनही दिली होती. या जागेत नाला असल्याने गावकऱ्यांनी या ऐवजी पर्यायी जागा देण्याची मागणी केली होती. दरम्यान, पुनर्वसनाच्या मागणीसंदर्भात घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी राज्य सरकारला तेलंगणात जाण्याचा इशारा दिला आहे.
१९८३ व १९९१ मध्ये पुन्हा गावातील घरात पाणी आले होते. २००६ मध्ये शासनाने बाधित कुटुंबाला पर्याची जागा उपलब्ध करुन द्या, असे म्हटले होते. या कुटुंबांनी -गडगा-काहाळा रोडवर शेतकऱ्यांकडून दानपत्रे घेऊन शासनाला पत्र सादर केले. ही जागा मिळावी म्हणून २०१२ ते २०१४ दरम्यान पाठपुरावा करताना उपोषणही करण्यात आले. मात्र, अद्यापही पुनर्वसन झालेच नाही. यामुळे काही गावकरी नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यात तर काही जन तेलंगणातील निझामाबाद येथे राहुन मोलमजुरी करत आहेत. गावातील ग्रामस्थांची संख्या कमी होत आहे.
भुकमारी हे गाव गडगा ते काहाळा या मार्गावर मुख्य रस्त्यापासून १.५ किलोमीटर दूर आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. तसेच बस, आरोग्य सेवा आदी प्राथमिक सुविधा नाहीत. जिल्हा परिषदेची शाळा फक्त चौथीपर्यंत आहे. या शाळेत जाण्यासाठी नाला ओलांडावा लागतो. या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी पंचायतीसमोर बैठक घेऊन पुनर्वसन करा अन्यथा आम्हाला गाव सोडून कुंटुबीयांसह तेलंगणात जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला.