2 लाखांवरील कर्जदारांना मोठा ‘दिलासा’ ! खातं मिळताच कृषिमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील या खातेवाटपास परवानगी दिली आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मालेगाव विधानसभा मतदार संघातील मंत्री दादा भुसे यांना मुख्यमंत्र्यांनी मोठी जबाबदारी दिली असून त्यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे.

दरम्यान दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, मी शेतकऱ्यांच्या चिंतामुक्तीसाठी काम करणार आहे. बोलण्यापेक्षा कृतीतून जास्तीत जास्त काम करेल. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून या पोशिंद्यास मान-सन्मान मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार मंडळींना, अभ्यासकांना, आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेतीसंदर्भातील विविध योजनांचं नियोजन केल जाईल, असेही दादा भुसेंनी सांगितले.

तसेच दादा भुसेंनी म्हटले की, मुख्यमंत्री महोदयांना केवळ २१ दिवसच झाले असूनसुद्धा कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी होईलच, पण शेतकऱ्याला कायमस्वरुपी चिंतामुक्त करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात उपसमिती नेमण्यात आली असून येणाऱ्या १५ दिवसांत उपसमिती अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर दोन लाखांवरील कर्जदार शेतकरी, नियमित कर्जपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही हिताचा निर्णय होईल. येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकरी आनंदी होणार असून सरकार यासाठी कटिबद्ध असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/