रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्रात दुसऱ्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आता कोरोनाबाधित रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा पूर्ण राज्यात तुटवडा निर्माण झाला असतानाच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार देखील होत होता. याला आता अटकाव घालण्यासाठी २ पद्धतीत इंजेक्शनचे वाटप केले जाणार आहे. असा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. त्यावेळी त्यांनी जालना येथे पत्रकारांशी सवांद साधला.

जालना येथे राजेश टोपे यांच्या हस्ते खासगी कोविड रुग्णालयांना १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांकडून निविदा पद्धतीनं हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि सरकारी रुग्णालयांना पुरवठा करेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात १ साठा असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे,असे टोपे म्हणाले. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची आवश्यकता लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण आणि देखरेख असल्याने काळाबाजार होणार नाही. यामधून खासगी रुग्णालयांना सुलभ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

या दरम्यान, टोपे म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सच्या म्हणण्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. तसेच, केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यानी केली आहे. परंतु, कोणतंही राज्य याबाबत सहकार्य करायला तयार नसून, आपल्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.