पारधी समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर शोधनिबंध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बेलवंडी (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया पवार यांनी ‘अहमदनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास’ टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शोधनिबंध सादर केला होता. विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्रदान केली आहे. त्यामुळे सदर महिला सरपंच डॉ. सुप्रिया पवार झाल्या आहेत.

पवार या बेलवंडी गावच्या जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या सरपंच आहेत. तसेच श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, पुणे इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पारधी समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर शोधनिबंध सादर केला होता. यासाठी त्यांना लोकाधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अरुण जाधव, राजेंद्र काळे, अजित भोसले, आसाराम काळे आदींनी मदत केली होती. त्यांच्या मदतीने पारधी समाजातील महिलांशी संवाद वाढवून त्यांनी शोधनिबंध तयार केला होता. मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतिहास विभागाचे प्रमुख दीपक गायकवाड यांनी काम पाहिले.

नुकत्याच झालेल्या टिळक विद्यापीठाच्या विद्याशाखेचे बैठकीतील सुप्रिया पवार यांना विद्यापीठाने विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यांना कालच याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. निवडीबद्दल त्यांचे बेलवंडी ग्रामस्थांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.