पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईत काम करणार्या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेने दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे परराज्यातील अनेक कामगार, मजुर कुटुंबीयांसह रवाना झाले होते. त्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या होत्या.त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने जून महिन्यापासून सामान्य प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात केली. श्रमिक गाड्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. परंतु जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिल होण्यास सुरुवात झाली.
बिघडलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी परराज्यात गेलेला मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागला आहे. मध्य रेल्वेच्या विशेष गाडयांमधून मुंबई महानगरात सर्वाधिक प्रवासी परतले आहेत. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी 15 विशेष गाडया सोडल्या. तेवढयाच गाडया मुंबईत येत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एकू ण 16 लाख 50 हजार जण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.