राज्यात 28 सप्टेंबरपासून पावसाचा परतीचा प्रवास ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पावसानंतर आता परतीच्या प्रवासासाठी पूरक असे वातावरण तयार झाले आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरु होऊ शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान काल जाहीर केले. त्यानुसार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवडयात राजस्थानच्या वायव्येस पावसाचे प्रमाण कमी असून आठवड्याच्या मध्यावर नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबर ही पावसाच्या परतीचा प्रवासाची सरासरी तारीख असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

या आठवडयात राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवड्यात 2 ते 8 ऑक्टोबर या काळात विदर्भाचा काही भाग वगळता इतरत्र पाऊस नसेल. सर्वसाधारणपणे पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर 15 दिवसात पूर्ण होतो. यंदा तो लवकर होण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबरपासून तो परतण्यास सुरुवात होईल. राजस्थानातून वारे नैर्ऋत्येऐवजी पूर्वेकडून वाहायला लागले की पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो.