आजाराला कंटाळून रिक्षाचालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन –  आजारपणाला कंटाळून रिक्षाचालकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. कणकवली शहरातील हळवल रेल्वे फाटकाजवळ शनिवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

वासुदेव दत्ताराम लाड (50 रा. कांबळीगल्‍ली, कणकवली ) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव लाड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आजारपणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे ट्रॅकमन गस्त घालताना त्यांना हळवल रेल्वे फाटकाजवळ लाड यांचा मृतदेह आढळला. रेल्वेची धडक बसून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॅकमनने कणकवली रेल्वे स्टेशनमास्तर आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कणकवली पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कणकवली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.