रिक्षा-टॅक्सी भाड्यात 3 रुपयांची वाढ, मुंबई महानगरात मार्चपासून अंमलबजावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाचे वाढते दर यामुळे रिक्षा- टॅक्सी चालकांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली असून १ मार्चपासून याची अंलबजावणी करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, सहा वर्षांनंतर रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून भाडेवाडीचा प्रश्न प्रलंबित होता. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र आता या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार रिक्षाचे पहिल्या टप्प्याचे भाडे १८ रुपयांवरून २१, तर टॅक्सीचे २२वरून २५ रुपये करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षाचे भाडे १४.२० रुपये, तर टॅक्सी भाडे १६.९३ रुपये करण्यात आले आहे. यामध्ये अनुक्रमे २.०१ व २.०९ रुपयांनी वाढले आहे. हि भाडेवाढ १ मार्चपासून लागू होणार आहे. मात्र, मीटर कॅलिब्रेशनसाठी तीन महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे ३१ मेपर्यंत दरपत्रकाच्या आधारावर भाडे आकारण्याची मुभा असेल. या कालावधीत सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी मीटर कॅलिब्रेट करून घ्यावे, असे आवाहनहि करण्यात आले आहे. दरम्यान, शेअर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही त्या अनुषंगाने वाढ केली जाईल. वाहतूक विभागाकडून संबंधित दर निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल दरवाढ झाल्यानंतर सीएनजी दरात वाढ झाली नसतानाही सीएनजी रिक्षांची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अडीच ते पावणेतीन लाख रिक्षा मुंबई, ठाणे परिसरात असून त्यापैकी अंदाजे ९७ टक्के रिक्षा सीएनजीवर चालतात.