‘बुवा-बबुआ’च्या ‘घटस्फोट’नंतर आता ‘हा’ पक्ष ‘महागठबंधन’ तोडण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काल दिल्लीत पार पडलेल्या चिंतन बैठकीत मायावती यांनी उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज पुन्हा महाआघाडी संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

या महाआघाडीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रीय लोकदल पक्ष देखील यातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्ल्याची माहिती समोर येत आहे. आज याबाबतची घोषणा होऊ शकते. याबाबत राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख चौधरी अजीत सिंह गंभीर विचार करत असल्याचे समजते. यासाठी त्यांनी आज त्यांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी महायुती केली होती. त्याचबरोबर आरएलडी देखील त्यांच्यासोबत युतीमध्ये होती. त्यावेळी बसपाने ३८, सपा ३७ आणि आरएलडीने ३ जागा लढविल्या होत्या. अमेठी आणि रायबरेलीची जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडली होती. मात्र दोघे एकत्र येऊन देखील भाजपला उत्तर प्रदेशात हरवू शकले नाही.

८० जागांपैकी बसपला केवळ १० जागा मिळाल्या. तर समाजवादीला ५ जागांवर समाधान मानावे लागले. तर एनडीएने ६४ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता या गोष्टींचा काहीच फायदा नसल्याने प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. दरम्यान, याअगोदर काल मायावती यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपण उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.