सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील चार तरुण दुचाकीवरून सेलू येथे सुरू असलेल्या श्री. केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेसाठी गेले होते. यात्रा पाहून उशिरा ढेंगळी पिंपळगावकडे जात असताना सेलू-परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ परभणीहून येणार्या स्कॉर्पिओ (एमएच २२ यु ८२२२) व दुचाकीची (एमएच २० एपी ४७९९) समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीवरील चार पैकी तीन जण जागीच ठार झाले. अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सिद्धार्थ शेषेराव मगर (वय २८), अविनाश महादेव मकासरे (३०), सिद्धार्थ आसाराम दवंडे (३०) या तिघांचा समावेश आहे. तर कुलदीप आसाराम पंडागळे (३०) हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीतील बलून उघडल्याने आतमधील नागरिकांना फारशी इजा झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस नाईक आप्पासाहेब वराडे, आनंता थोरवट, लक्ष्मण चव्हाण, संतोष पैठणे, शेलार यांनी घटनास्थळी धाव घेवून रूग्णवाहिकेला पाचारण केले. अपघातात मरण पावलेले तिघेही ढेंगळी पिंपळगाव येथील असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.