रोहित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘ED कडून कारवायाऐवजी देशातील Oxygen च्या स्थितीकडे लक्ष द्या’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशावेळी कोरोनाच्या स्थितीवर लक्ष देण्याचे सोडून केंद्र सरकार ईडी आणि इतर गोष्टी आणत आहे, त्यांनी महत्त्वाच्या मूळ मुद्द्यावर आधी लक्ष द्यावे असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर सोडले आहे. केंद्र सरकार कायमच राजकीय हेतूने यंत्रणांचा वापर करून कारवाई करत असल्याचे दिसत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई हा त्याचाच भाग असल्याचे आमदार पवार म्हणाले. यापूर्वी प. बंगालमध्ये ईडी, सीबीआय असा सर्व यंत्रणा वापरल्या गेल्या. पण तिथे काय झाले हे सर्वांना माहीतच असल्याचे ते म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले, देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लस उपलब्ध नाही. राज्यातील भाजपने आणि केंद्राने यावर लक्ष द्यावे. पण तस काही न करता कारवाईसाठी ईडीला आणले जात आहे. हे सर्व का आणि कशाससाठी सुरु आहे हे लोकांनाही चांगलच समजत असल्याचे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारने लसीकरणाचे नियोजन योग्यरित्या केल नाही. त्याचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे. सध्या अनेक ठिकाणी लसीकरण बंद पडल्याचे ते म्हणाले. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यातील काही महत्त्वाच्या समस्यांमध्ये केंद्राकडून मदत हवी आहे. त्यासाठी किमान राज्यपालांनी लक्ष घालावे यासाठी ही भेट असावी, असे पवार म्हणाले. तसेच बारामतीमध्ये 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने वाटप केले आहे. लोकांना त्याचा आता संकटात उपयोग होईल. सामाजिक हेतूने ही मदत केल्याचे रोहित पवार म्हणाले. गेल्यावर्षी वर्ष सॅनिटाझयरचा तुटवडा होता तेंव्हा त्याचे वाटप केले होते. यंदा ऑक्सिजन तुटवडा आहे, त्यामुळे ही मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार पवार यांनी म्हटले आहे.